________________
अनेकान्तवादानुसार कोणत्याही व्यवहाराला सर्व पर्याय असतात. म्हणून तर काही दार्शनिक जरी कर्मसिद्धांत, पूर्वजन्म- पुनर्जन्म, स्वर्ग-नरक आदि संकल्पनांना मानीत नसले, तरी जैन धर्म यांना मानतो. त्यांचे अस्तित्व स्वीकारतो.
यावरून एक गोष्ट निश्चित आहे की, प्रत्येक वेळी आपलेच म्हणणे बरोबर आहे असा दुराग्रह बाळगता कामा नये. दुसऱ्याचेही म्हणणे सयुक्तिक असू शकते याचा विचार करावयास हवा. अनेकान्तवादाच्या या वैचारिक उदारतेचा उपयोग, गैरसमजुती, दूषित दुराग्रह, अहंभाव, स्वार्थी विचार, विवेकशून्यता अशा कितीतरी गोष्टी दूर करावयास होतो. या वैचारिक उदारतेचा स्त्रियांकरिता उपयोग करणाऱ्यांमध्ये महावीर अग्रणी होते. त्यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समानतेची वागणूक दिली. त्यांना संघात दीक्षा दिली. त्यांना संघप्रमुख करून त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्या.
व्यवहारातही अनेकान्तवाद अनेक ठिकाणी वापरलेला दिसतो. स्त्रियांकरिता आरक्षण, विधवा पुनर्विवाह, संसद व विरोधी पक्ष, भारताची सर्वंकष राज्यघटना ही काही त्याची उदाहरणे आहेत. मात्र त्याचबरोबर संप, जाळपोळ, मारामाऱ्या, दगडफेक आदि एकान्तवादाचा आश्रय घेणाऱ्या घटना, अनेकान्तवादाचा पुरस्कार करणाऱ्यांची शोकांतिका दर्शवितात.
अर्थात् अनेकान्तवादालाही मर्यादा आहेत. धार्मिक बाबतीत जिनांनी सांगितलेली षड्द्द्रव्ये, नऊ तत्त्वे, मोक्ष, सिद्धशिला आदि संकल्पनांवर श्रद्धा ठेवावयासच हवी. तसेच व्यवहारी जगतातील खून, बलात्कार, भ्रष्टाचार, देशद्रोह या गोष्टी निंदनीयच आहेत. या दोन्ही प्रकारात अनेकान्तवाद वापरताच येत नाही. किंबहुना, महावीरांनी त्या काळी वैदिक कर्मकांडाला केलेला विरोध हा अनेकान्तवादाची मर्यादा ओळखूनच केला असावा, असाही विचार मनात येतो.
१९६