Book Title: Sanmati Teerth Varshik Patrica 2013
Author(s): Nalin Joshi, Kaumudi Baldota, Anita Bothra
Publisher: Sanmati Teerth Pune
View full book text
________________
जागरूक रहाण्याऐवजी नकारात्मक दृष्टीच वाढीस लागली.
आचारांगासारख्या अर्धमागधी आगमात दर क्षणाला सजीवसृष्टीकडे पाहण्यास सांगितले आहे. संवेदनशील राहण्यास सांगितले आहे. आजूबाजूच्या निसर्गातील पृथ्वी, अप्, तेज, वायू, वनस्पती इ. एकेंद्रिय जीवच नव्हे तर संपूर्ण जीवांच्या प्राणिरक्षेविषयी जागरूक व अप्रमत्त राहण्याचा संदेश दिला आहे. जर आपण त्यांच्याकडे सारखे पापात्मक दृष्टीने पाहू तर त्यांच्या जवळ जाणे, त्यांचे आपल्या मुलाबाळांप्रमाणे संगोपन करणे, त्यांच्यावर प्रेम करणे, या भावना कशा वाढीस लागतील ?
वनस्पतींना इजा होईल, त्यांना दुखापत होईल म्हणून आपला वापर तर थांबत नाही ना ? जपा म्हणजे काय ? कमी वापरा म्हणजे काय ? अपरिग्रहाचा खरा अर्थ काय ? - जर आपण उपयोग करतो तर अशाप्रकारचे 'कातडी बचावू' धोरण काय कामाचे ? उलट वंशसातत्य टिकवून ठेवण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक मनुष्याने वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन आपल्या मुलाबाळांप्रमाणे केलेच पाहिजे.
प्रत्येक जैनाचे कर्तव्य आहे की -
१) आपल्या घरासमोर एक छोटीशी का होईना ‘बाग' असावी ज्यामुळे आपल्या घरातील सर्व ओला कचरा मातीत टाकून त्याचे खत निर्माण होईल. (ही जैनदृष्टीने ‘परिष्ठापना समिति' आहे.)
२) पाण्यालाही अप्कायिक जीव मानणाऱ्या जैनांनी, निसर्गत: पावसाच्या रूपाने मिळणारे पाणी rainwater harvesting'च्या रूपाने उपयोगात आणले पाहिजे.
३) सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा ‘सोलर' बसवून उपयोग केला पाहिजे ज्यामुळे विजेची बचत अर्थातच अग्निकायिक जीवांचे आणि पर्यायाने अप्कायिक जीवांचेही संरक्षण होईल.
४) शक्यतो नैसर्गिक व कृत्रिम दोन्ही फुलांचा वापर करू नये. टाळता येत असेल तर टाळा. कृत्रिम फुलांचा वापर तर मुळीच करू नका. कारण त्यांना निसर्गात पुन्हा जिरवता येणार नाही. रासायनिक प्रक्रियेद्वारा त्यांचीनिर्मिती होत असल्यामुळे पर्यावरणाला ते अधिकच घातक आहेत.
५) दानांमध्ये अग्रेसर असणाऱ्या व संपूर्ण प्राणिरक्षेविषयी जागरूक असणाऱ्या जैनांनी फक्त मंदिर, मूर्ति, तीर्थयात्रा, गोरक्षण इ. दानांबरोबरच, सर्व दानात श्रेष्ठ अभयदान', त्याचे महत्त्व लक्षात घेऊन 'अभयारण्या सारख्या प्रकल्पांना निधी पुरविला पाहिजे.
नव्या पिढीमध्ये ही जागृती निर्माण झाली आहे. त्या पिढीची नीरस जगण्याची वृत्ती नाही. ज्याचा आपण उपयोग करतो, त्याच्या निर्मितीपासून पलायन करण्याचा त्यांचा स्वभाव नाही. तर आपणही आपल्या निषेधात्मक दृष्टीला दूर करून सकारात्मक दृष्टीचे नवे वळण देऊ या.
‘पर्यावरणरक्षणाला अनुकूल धर्म', आपण खऱ्या अर्थाने प्रत्याक्षात आणू या. जैनधर्माच्या हृदयाशी सुसंगत वागू या. अतिरेक तर नक्कीच टाळू या. “ecofriendfly', biodiversity' असे फक्त शाब्दिक उपयोग न करता, खऱ्या अर्थाने निसर्गाच्या जवळ जाऊ या. निसर्गाचा आनंद घेऊ या. कर्तव्यदक्ष राह या. झाडांच्या जवळ आपण जाणे याचा अर्थ फक्त झाडांचा आनंद व ऑक्सिजन घेणे एवढाच नव्हे तर मी जे नि:श्वास टाकते ते खरोखरच झाडांनाही तितकेच जीवनदायी आहेत, अशीही दृष्टी ठेवू या. आपल्या संरक्षणरूपी जमेच्या भक्कम बाजूबरोबरच, संवर्धनाची दुर्बल बाजू लक्षात घेऊन, तिला सक्षम बनविण्यासाठी भ. ऋषभदेवांचा क्रियात्मक आदर्श समोर ठेवू य व अधी-अधूरी' बाजूही परिपूर्ण करू या. एक सामाजिक चळवळ या स्वरूपात आता ‘ऋषभभगवान वृक्ष लागवड योजना' खऱ्या अर्थाने आपलीशी करून प्रत्यक्षात आणू या.
*****
*****