________________
जिनेंद्रांनी दिली दृष्टी, ही तर एकेंद्रियांची सृष्टी । हिंसा - चौर्य - परिग्रहावरच, उभारलीय् मानवी संस्कृती |
संस्कृती सोडू शकत नाही, बदलू शकतो आपली नजर । गौतमांची अप्रमत्तता ठेवू,
मनाच्या तळाशी सदैव हजर !!
सारांश काय ? एकेंद्रिय जीवांना अभय म्हणजे पर्यावरण रक्षण नव्हे काय ?
१०) प्रतिकूल परिस्थितीशी सामना :
या मुद्याला तत्त्वज्ञानात स्थान लाभलं आहे ते परीषह व उपसर्गांच्या रूपानं ! २२ परीषह व त्रिविध उपसर्गांना महावीरांनी कर्मनिर्जरेचे साधन मानले ! जरा मनाविरुद्ध, प्रतिकूल झालं की व्यवहारात आपला तोल जातो. चिडचिड होते. शीत-उष्ण-दंश-मशक यांचा भयंकर त्रास होतो. मानसिक परीषह तर आम्हाला मनोरुग्णतेच्या पातळीपर्यंत नेऊन पोहोचवितात. दुहेरी उपयोगी आहे हा कर्मनिजरेचा सिद्धांत ! शारीरिक, मानसिक आरोग्य ठेवतो वआत्म्याचीही उन्नती करतो. दहशतवादी कारवाया अगर शत्रूंच्या आक्रमणाला मात्र परीषह मानून कर्मनिजरेचे साधन मानणे भयंकर घातक ठरेल. राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांसाठी व्यवहारनयाने राष्ट्रीय अस्मिताच योग्य ठरेल !
११) नि:शल्यीकरण :
कोणतेही व्रत ग्रहण करण्यापूर्वी मानसिक शल्ये दूर करणं अत्यावश्यक आहे असे जैन दर्शनाचे प्रतिपादन आहे. ही एक प्रकारची शल्यक्रिया म्हणजे सर्जरीच आहे. कपट, ढोंग, अंधविश्वास, एकमेकांविषयीचे गैरसमज, किंतु त्याचे द्वेषात झालेले रूपांतर, या सर्वांमुळे आपली मनं नेहमी टाचणीघरासारख्या pin-holder) अवस्थेत असतात. ख्रिश्चन धर्मात confession ritual यासाठीच आहे. महाभारतात, भीष्मांचा “शरपंजर” मला कायम या शल्योद्धाराची आठवण करून देत आला आहे.
१२) स्त्रियांना असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्थान :
जैन आगमात, २६०० वर्षापूर्वी होऊन गेलेल्या अनेक स्त्रियांचे यथार्थ दर्शन घडते. पुरुष आचार्यांनी हजारो वर्षे तोंडी परंपरेने जपलेल्या या आगमांमधून इतक्या प्रभावी स्त्रियांचे कार्य आपल्यापर्यंत पोहोचले आहे. तीर्थंकरमल्ली, साध्वी राजीमती, आर्या चंदना, राणी कमलावती, कनकध्वज राजाची पत्नी पद्मावती, थापत्या गृहपत्नी, शंख श्रावकाची पत्नी उत्पन्न, जिज्ञासू श्राविका जयंती, स्पष्टवक्ती अग्निमित्रा, भातशेतीत प्रवीण व अर्थसल्लागार स्नुषा रोहिणी, १८ देशी भाषात विशारद अशा देवदत्ता, अनंगसेना, कामध्वजेसारख्या गणिका असंख्य कर्तृत्ववान् स्त्रिया आहेत या आगम व आगमटीकाग्रंथांमध्ये ! हे स्थान त्यांनी मिळविले आहे आपल्या चारित्र्याच्या व कौशल्याच्या बळावर ! जै धर्मात असलेले हे स्त्रियांचे स्थान आधुनिक स्त्री चळवळींनाही स्फूर्तिप्रद ठरेल !
...
उपसंहार :
वरील १२ मुद्दे केवळ दिग्दर्शनाखातर आहेत. या दर्शनातील जवळजवळ सगळ्याच गोष्टी सदासर्वकाळ स्वीकारणीयच आहेत. सर्वात महत्त्वाचा आहे प्रत्येकानं स्वयंप्रेरणेनं केलेला अभ्यास व त्यातून होणारी 'स्वसामर्थ्याची जाणीव' ! जय जिनेंद्र ! जय भारत !!
**********