________________
पुण्डरीक अ. १) संसाररूपी पुष्करणी कषाययुक्त कर्मरूपी पाण्याने भरली कामभोगाच्या दलदलीत आर्यरूपी कमळे उमलली चार वादींची भेट झाली, पुष्करणीतील श्रेष्ठ पुण्डरीक-कमल घेण्यासाठी धडपड चालली. अज्ञानाची कास धरली आणि एकमेकांना कमी लेखत लेखत त्यांची इच्छितापासून भटकंती झाली सिद्ध मार्ग जाणणाऱ्या साधकाने मात्र आध्यात्मिक उन्नतीच्या बळावर इष्टाची प्राप्ती केली ।। क्रियास्थान -२) भटकंती झालेले अज्ञानी आशा, आकांक्षा, हव्यास, अत्याचार, अनाचारांच्या बारा क्रियास्थानात अडकले आणि अधर्मस्थानात रमत गेले. विवेकाचा त्याग करून निष्प्रयोजनाने हिंसा करण्यात मग्न झाले. चाळीस प्रकारच्या पापश्रुतात स्वत:ला झोकत राहिले. पारिवारिक मोहाच्या पसाऱ्याने अर्थदंडात हरवले. अनर्थदंडाच्या पापाने जन्ममरणाच्या परंपरेत फिरत राहिले. तेराव्या इयापथिकी क्रियास्थानातले धर्मस्थानात जागृत झाले. आत्मार्थी, पुरुषार्थी, मोक्षार्थी बनून निवृत्तीच्या मार्गावर चालू लागले ।। महापरिज्ञा - ३) जन्ममरणाच्या परंपरेत अडकलेले आहारपरिज्ञेचे अभ्यासू झाले. आहाराशी संबंधित साऱ्या सावध क्रियेत प्रवृत्त झाले. 'जसा आहार, जशा भावना तसे गतितील परिभ्रमण', हा कर्मसिद्धांत मात्र ते विसरले. त्रस-स्थावर एकमेकांचा आधार म्हणून मित्र झाले आणि एकमेकांना खाऊनच जीवन जगू लागले. ओजआहार, प्रक्षेपआहार, कवलआहार असे आहाराचे विभाजन केले. सबल म्हणवणाऱ्या माणसाने निर्बल अशा प्राण्यांचे प्राण घेतले. आहाराचा विवेक करणारे हिंसेपासून दर होऊ लागले. त्याग, विरति, प्रतिज्ञा, संकल्प करून यतनावान होऊन विचरण करू लागले ।। प्रत्याख्यानक्रिया - ४) कर्मसिद्धांत न जाणणाऱ्याने मानवी मनात दडलेल्या अठरा पापस्थानांच्या अंत:प्रवृत्तीचे वेळोवेळी प्रसंगाप्रसंगाला प्रदर्शन केले. त्यातून मुक्त व्हायचेच नाही म्हणून अप्रत्याख्यानी बनून पापकर्माच्या बंधनाचे जाळे विणले. जीवन जगण्याच्या मुख्य गरजा, अन्न, पाणी, निवाऱ्यासाठी हिंसेचे थैमान घातले. मन-वचन-कायेच्या वक्रतेने आत्म्याचे भान विसरून जन्म-मृत्यूच्या चक्रात गुरफटले. सदाचारी, सद्विचारी अनिच्छेने टाळता येतच नाही अशा हिंसेचे भागीदार जरी बनले, तरी पश्चात्ताप करून, क्षमाभाव धरून, प्रायश्चित्त घेऊन प्रत्याख्यानी बनले आणि उच्च गतीकडे मार्गक्रमणा करू लागले ।। आचारश्रुत - ५) मन-वचन-कायेच्या वक्रतेने मिथ्या धारणेच्या आहारी गेले. सत्याची ओळख न झाल्याने अर्थरहित तत्त्वाने मोक्षमार्गाचे विराधक बनले. जग एकांत नित्य-एकांत अनित्य, भवीजीव मोक्षगामी, बाकी सारे संसारी. सूक्ष्माची हिंसा किंवा त्रसांची हिंसा पाप सारखेच, उपयोग लक्षणाने युक्त जीव नाहीच साऱ्या क्रिया करणारे पंचमहाभूतच, उद्दिष्ट आहार करणारे साधू आधाकर्मीच, अशी अनेक प्रकारची विधाने करून अनाचाराला गाठले, वाणीचे बंधन सोडले. एकांतवादी बनून वादविवादाला पाचारण केले. आशुप्रज्ञ बुद्धिमानांनी, साधकांनी वचनगुप्ती साधून अनेकांत दृष्टीने चिंतन केले. आणि श्रुत चारित्र्यरूपी धर्माला, सदभावाच्या सत्तेला मानले.