________________
जैन धर्म आणि अहिंसा
(म. गांधींच्या विशेष संदर्भात) (गांधीजयंतीनिमित्त आयोजित, गांधीभवन, कोथरूड दि. ५.१०.२०१२, येथील व्याख्यानमालेत 'जैन धर्म आणि अहिंसा' हे तिसरे पुष्प प्रा.डॉ. नलिनी जोशी यांनी गुंफले. 'अहिंसेविषयीचे जैन धर्मातील नेमके स्थान आणि वास्तविकता' याने भरलेल्या या व्याख्यानाची दाद फक्त जाणकार आणि नवख्या उपस्थितांनीच नव्हे तर कर्णोपकर्णी ऐकलेल्या श्रोत्यांनीही दिलेली आहे. व्याख्यानाचे शब्दांकन येथे प्रस्तुत करीत आहे - डॉ. कौमुदी बलदोटा)
'जैन धर्म आणि अहिंसा' या व्याख्यानात पाच मुद्यांनी विचार केलेला आहे. ते मुद्दे असे - अ) जैनांची अहिंसा : प्रस्तावना ब) जैनवर्णित अहिंसेचे प्रकार-उपप्रकार क) जैनांच्या अहिंसेचे व्यावहारिक परिणाम ड) गांधीजींचे जैन धर्म व जनतेस योगदान इ) जैन युवक-युवतींचे विचार
अ) जैनांची अहिंसा : प्रस्तावना ___जैन शास्त्राची आधारशिलाच अहिंसा आहे. किंबहुना जैन धर्माचे पर्यायी नावच अहिंसाधर्म आहे. आणि तीच त्यांची ओळख आहे. जैन धर्माच्या मांडणीची ठराविक पद्धत अशी आहे की अहिंसा, अनेकान्तवाद, स्याद्वाद, नयवाद, कर्मसिद्धांत, विज्ञानानुकूलता, उदारमतवाद, क्षमाशीलता, पर्यावरणाला अनुकूलता, शाकाहार, व्यसनमुक्ती हे सर्व जैनधर्मात असल्याने, हा धर्म वैश्विक धर्म' होण्याच्या योग्यतेचा आहे. यात नाही असे जगात काहीच नाहि. 'जगातले सर्व प्रश्न, कलह सुटण्याचा हमखास उपाय जैन तत्त्वांमध्ये आहे'-अशी जपमाळ जैन व्यक्ती सतत ओढीत असतात. 'जगातले सर्व प्रश्न फक्त जैनधर्मच सोडवू शकतात'-असा एकमेव दावा करणारे जैन हे लोकसंख्येच्या जेमतेम १ टक्का आहेत, ह्याचे आपण भान ठेवले पाहिजे.
शिवाय 'अहिंसा' ही काही फक्त जैनांची मक्तेदारी नाही. 'अहिंसा परमो धर्मः' हे सुप्रसिद्ध वचन महाभारतात दोनदा आले आहे. गीतेत याचे विवेचन आहेच. पातंजलयोगात यम-नियम इत्यादि अष्टांगयोगात अहिंसा प्रथम स्थानावर आहे. बौद्धांच्या पिटकातही गौतम बुद्धांना ‘परमकारुणिक' संबोधून अहिंसा व्यक्त झालेली आहे. जैनांची अहिंसा ही सर्वश्रेष्ठ आहे असे नसून, तिची मांडण्याची पद्धती अलग आहे, सूक्ष्मतम आणि तरलग्राही आहे. जसे अहिंसा-सत्य-अस्तेय-ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह अशी महाव्रतांची नावे न सांगता, प्राणातिपात-विरमण, मृषावादविरमण, अदत्तादान-विरमण, मैथुन-विरमण आणि परिग्रह-विरमण, अशी नावे सर्व जुन्या ग्रंथात येतात. विरमण अर्थात् विरति अर्थात् त्यागाच्या रूपात केली जाणारी मर्यादा, हे या नावामधून अभिप्रेत आहे. प्राणातिपात म्हणजे प्राणांचा अतिपात म्हणजे प्राणांचा घात किंवा इजा, दुखापत. साधुसाध्वी आजीवन सर्वांशाने हिंसेचा त्याग करून अहिंसा महाव्रताचे पालन करतात तर गृहस्थ अथवा श्रावक-श्राविका आंशिक रूपात, स्थूलपणे अहिंसापालन करतात.
'जैन पावभाजी', विमानात-आगगाडीत 'जैन फूड' यासारखी जैन अहिंसा' ही काही वेगळी आहे का ? तर जैनांच्या अहिंसेचे वेगळेपण तिच्या मांडणीत, त्याच्या सूक्ष्मतेत, प्रकार आणि उपप्रकारात आणि मुख्यत: आचारव्यवहारात दडलेले आहे.
शरखी जैन अहिंसा' ही काही वेगळी आहे का ? तर