________________
ग्रंथाशी जोडल्यास फार दूरान्वय होणार नाही, असे वाटते. गुणाढ्य कवीच्या ‘बड्डकहा'तून स्फूर्ती घेऊन संघदास आणि धर्मसेन या दोन जैन गणिवर्यांनी हा ग्रंथ लिहिला. कृष्णपिता वसुदेवाची वेगळीच माहिती त्यातून मिळते. वसुदेवाला भ्रमणाची (हिंडण्याची) फार आवड. अनेक वेषांतरे करून, (बहुरूपी बनून), अलंकार धारण करून (कवड्यांच्या माळा), मुकुटात मोरपीस खोचून त्याने १०० वर्षे भारतभ्रमण केले. तो गायनकलेत प्रवीण होता. प्रवासाहून आल्यावर त्याने ते वृत्तांत लिहिले. तोच ग्रंथ (आर्ष) महाराष्ट्री भाषेतला पहिला प्रवासवर्णनपर गद्यग्रंथ म्हणावयास हवा. सहाव्या शतकातील हा ग्रंथ प्राकृतच्या नव्या-जुन्या अभ्यासकांनी खूप प्रशंसिला आहे.
(७) 'कुवलयमाला' ग्रंथातील अठरा देशीभाषांमध्ये मराठीचा नमुना :
‘दाक्षिण्यचिह्न' उद्योतनसूरींचा ‘कुवलयमाला' हा प्रेमाख्यान सांगणारा ग्रंथ त्यांनी इ.स. ७७८ ला लिहून पूर्ण केला. 'दाक्षिण्यचिह्न' आणि महाराष्ट्री भाषेवर विलक्षण प्रभुत्व ! याही दृष्टीने भरताच्या नाट्यशास्त्रातील 'दाक्षिणात्य ही 'महाराष्ट्री' असू शकते. साहित्यिक भाषांखेरीज वेगळ्या १८ बोलीभाषांचे नमुने त्यात नमूद केले आहेत. ते म्हणतात, “मरहट्ठ देशातील लोक धष्टपुष्ट, काहीसे ठेंगणे, वर्णाने सावळे, सहनशील, अभिमानी आणि भांडखोर असतात. 'दिण्णल्ले गहियल्ले' (दिले-घेतले)-अशा शब्दांचा प्रयोग ते करतात.” (कुवलयमाला पृ.१५२-१५३)
कुवलयमाला ग्रंथ सांस्कृतिक संदर्भांनी खचाखच भरलेला आहे. जैन महाराष्ट्री भाषेतला तो एक मूर्धन्यस्थानी तळपणाऱ्या हिऱ्यासारखा ग्रंथ आहे.
____ 'लीलावती' ह्या कवी कौतूहलरचित महाराष्ट्री ग्रंथात (इ.स.८ वे शतक) कवी म्हणतो, 'रइयं मरहट्ठ-देसिभासाए ।' (लीलावती. गाथा १३३०) अर्थात . ही रचना मी महाराष्टी (मराठी) देशी भाषेत केली आहे.' कुवलयमालाचा ग्रंथकारही, ‘पाइयभासारइया मरहठ्य-देसि-वण्णय-णिबद्धा' असे शब्द वापरतो. (पृ.४)
'देशी-शब्द-कोश' या ग्रंथात पृ.२४ वर नमूद केले आहे की महाराष्ट्रातील संतकवी ज्ञानेश्वरांनीही 'मराठसाठी 'देशी' हा शब्द प्रयुक्त केला आहे.
(८) 'गाथा' शब्दाची प्राचीनता :
'गाथासप्तशती'-हा महाराष्ट्री भाषेतला इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या शतकातील मुक्तकांचा (द्विपदींचा, गाथांचा) संग्रह आहे. १६ व्या शतकातील संत तुकारामांच्या पद्यसंग्रहासही 'तुकारामांचा गाथा' असे म्हणतात.
__महाराष्ट्री मुळातच गीतभाषा आहे. 'गाथा' हा एक लोकप्रिय छंद अथवा वृत्त आहे. संस्कृतमध्ये जो ‘श्लोक' किंवा 'आर्या' तीच प्राकृतमध्ये 'गाथा'. 'वृत्तजातिसमुच्चय' ग्रंथात विरहांक (अथवा हरिभद्र) या लेखकाने (काल अंदाजे ६ वे-८ वे शतक) 'गाथा' छंदाचे लक्षण आणि २६ प्रकार दिले आहेत.
__'गाथालक्षण' ग्रंथात जैन मुनी नंदिताढ्य (इ.स.१०००) यांनी ९६ गाथांमध्ये 'गाथा' छंदाचे विवेचन केले आहे.
'गाथा' (गाहा) शब्दाचा सर्वात प्राचीन उपयोग जैनांच्या सूत्रकृतांग' या अर्धमागधी ग्रंथात दिसतो. 'उत्तराध्ययन' नामक ग्रंथातही 'गाहासोलसग' असा निर्देश येतो. हे अर्धमागधी उल्लेख इसवीसनपूर्व काळातील मानले जातात.
(९) गाथासप्तशती आणि जैन आचार्य ‘पादलिप्त' :
पादलिप्त हे अतिशय प्रभावक जैन आचार्य होऊन गेले. (इ.स.१ ले-२ रे शतक). 'गाथासप्तशती' (अथवा गाहाकोस) या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये त्यांचे भरीव योगदान आहे. कुवलयमाला ग्रंथात (इ.स.७७८) पादलिप्तांबोबर सातवाहन आणि षट्प्रज्ञक यांचे उल्लेख आहेत. 'पालित्तयेण हालो हारेण व सहइ गोट्ठीसु'-यामध्ये पादलिप्तांना 'सातवाहनाच्या गळ्यातला हार' म्हटले आहे. त्यांच्या आज उपलब्ध नसलेल्या तरंगवईकहा' नावाच्या अप्रतिम काव्यग्रंथाचा उल्लेख आहे. त्यांचे हे प्रेमाख्यान महाराष्ट्रीत (जैन महाराष्ट्रीत नव्हे) लिहिलेले होते.