________________ शोधणारी म्हातारी, समुद्राच्या तळाशी गेलेले हरवलेले रत्न शोधणारा नावाडी - असे एकाहून एक सरस दृष्टान्त थे आढळतात. 'सुखबोधा' नावाच्या एका ग्रंथात तर अक्षरश: शेकडो कथा प्रसंगोपात्त सांगितल्या आहेत. आधीच्या ग्रंथात बीजरूपाने आलेल्या कथा नंतर-नंतरच्या ग्रंथात अधिकाधिक सुरस करून सांगितलेल्या दिसतात. सुप्रसिद्ध अर्थशास्त्रकार चाणक्य ऊर्फ कौटिल्य याच्या जीवनाविषयीच्या काही कथा ‘आवश्यकचूर्णी' या 6-7 व्या शतकातील ग्रंथात प्रथम आढळल्या. वैदिक अथवा हिंदू आणि बौद्ध ग्रंथात या कथा सामान्यत: आढळत नाहीत. माझे कुतूहल चांगलेच जागृत झाले. प्राकृत आणि संस्कृत साहित्यात चाणक्याचा कसून शोध घेतला. सुमो 30-35 ग्रंथात चाणक्याच्या अनेक कथा आढळल्या. त्याचा जन्म, जन्मगाव, आईवडील, शिक्षण, नंदाच्या भोजनशालेतील अपमान, प्रतिज्ञा, चंद्रगुप्ताचा शोध, त्याचं रक्षण आणि शिक्षण, पाटलीपुत्रावर अयशस्वी हल्ले, पर्वतकाचे सहाय्य, दोघात राज्यविभागणी, विषकन्येची योजना, राज्याचा खजिना वाढविण्याचे प्रयत्न, कडक राज्यशासन, काही निष्ठुर, निर्णय, चंद्रगुप्ताचा मृत्यू, बिंदुसाराचा राज्याभिषेक, ‘सुबन्धु' नावाच्या नंदाच्या पक्षपाती मंत्र्याने चाणक्याशी धरलेले शत्रुत्व, बिंदुसाराची नाराजी, चाणक्याची निवृत्ती, त्याने एका गोठ्यात समाधी घेणं, सुबंधूने गोठ्यास कपटानं आग लावणं, चाणक्याचे प्रायोपगमन व अखेरीस मृत्यू - या साऱ्या ठळक घटना प्रथम विखुरलेल्या कथाभागांच्या रूपानं जैन साहित्यात दिसतात. हेमचन्द्र नावाच्या आचार्यांनी त्यांचं संकलन करून सलग चरित्र 12 व्या शतकात संस्कृतात लिहिलं. दिगंबर आचार्य हरिषेण यांनी आपल्या बृहत्कथेत चाणक्याचे पूर्ण जैनीकरण करून वेगळीच कथा लिहिलेली दिसते. चाणक्याची अपूर्व बुद्धिमत्ता, कडक शासनव्यवस्था आणि निरासक्ती यामुळे जैन परंपरेनं त्याला गौरवलेलं दिसतं. डोळस संशोधकाला जैन कथा साहित्यातील असे अनेक विषय खुणावत रहातात. 11 वे-१२ वे शतक जैन कथासाहित्याचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. या काळात स्वतंत्र कथासंग्रहांची निर्मिती होऊ लागली. कथाकोषप्रकरण, आख्यानमणिकोश, कुमारपालप्रतिबोध, मनोरमाकथा ही काही सुप्रसिद्ध जैन कथाग्रंथांची नावं सांगता येतील. उपदेशप्रधान कथाग्रंथांची जणू लाट उसळलेली दिसते. उपदेशपद, उपदेशमाल धर्मोपदेशमालाविवरण, उपदेशतरंगिणी ही त्यातील काही नावं. 'कहकोसु' अर्थात् ‘कथाकोष' नावाच्या अपभ्रंश ग्रंथात तत्कालीन प्रचलित कथांचा अप्रतिम संग्रह करून ठेवला आहे. श्रोतेहो, जैन कथासाहित्यातील काही वेचक कथारत्नांचा आता रसग्रहणात्मक आस्वाद घेऊ. 'मेखल' नावाच्या एका साध्या, अशिक्षित परंतु बुद्धिमान गवळ्याने चार भावांच्या सांपत्तिक वाटण्यांचा तंटा कसा कुशलतेने सोडवला याची कथा 'मनोरमा' कथासंग्रहात येते. घरात शूरपणा दाखवणाऱ्या सोनाराचे भित्रे स्वरूप - त्याची पत्नी कोणत्या प्रसंगानं उघड करते, हे आपल्याला 'गृहशूर' कथेतून दिसतं. परकायाप्रवेशविद्येचं वर्णन करणारी विक्रमादित्याची कथा अशीच अद्भुतरम्य आहे. 'जसजसा जास्त पैसा येईल तसतशी बुद्धी फिरत जाते' - हे स्पष्ट करणाऱ्या दोन कथा खूपच रंजक आहेत. एकीचे नाव आहे 'अनर्थकारक अर्थ' आणि दुसरीचेनाव आहे ‘पापाचा बाप कोण ?'. साधूंची टिंगलटवाळी करण्यासाठी चंडचूडाने नियम घेतला की, 'समोरच्या कुंभाराचं झळझळतं टक्कल मध्यान्हीच्या उन्हात पाह्यल्याशिवाय मी भोजन घेणार नाही.' हा थट्टेनं घेतलेला नियम पाळताना कोणत्या अडचणी आल्या, त्याचं कोणते फळ मिळालं, याची ही गंमतीदार कथा लहान मुलांना खूपच आवडते. वसुदेवहिंडीतील कोंकणक ब्राह्मणाची कथा, लोकांना पशुबळीपासून दूर करण्याच्या उद्देशानं लिहिली असली तरी तिची मांडणी अतिशय आकर्षक आणि कुतूहल शेवटपर्यंत टिकवून ठेवणारी आहे. भाग्यात नसेल तर कमनशिबी माणसाला देवाचे कितीही वर मिळाले तरी त्याच्या परिस्थितीत काही फरक पडत नाही. याउलट भाग्यात असेल तर गरीब अंध व्यक्तीसुद्धा उत्कर्षाला जाऊ शकते - असं तात्पर्य ‘प्राकृतविज्ञान-कथे'तल्या दुर्दैवी' या कथेत आढळते. श्रीपालकथेत सुरसुंदरी आणि मदनासुंदरी या दोन बहिणींची संलचक गोष्ट रंगवून रंगवून सांगितली आहे. राजाला फार गर्व होतो की माझ्या मुलींना मी जन्म दिला. त्या रूपवतीगुणवती-श्रीमंत आहेत. त्यांचा भाग्यविधाता मीच आहे. मीच त्यांना योग्य पती निवडून देईन. सुरसुंदरी सतत