________________
चालूच आहे आणि म्हणूनच वनस्पतींच्या सर्व जाती-प्रजाती टिकवून ठेवण्यासाठी संरक्षणाबरोबर संवर्धनही तितकेच महत्त्वाचे ठरते.
भ. ऋषभदेवांचा जीवनकाळ चालू होता. अवसर्पिणी काळातील तिसरा 'सुषमा - दुषमा' आरा सुरू होता. -हासकाळ सुरू झाला होता. कल्पवृक्षाचे वैभव क्षीण झाले होते. म्हणजेच सामान्य भाषेत आपण असे म्हणू शकतो की, आपल्या गरजा निसर्गातून, ज्या अगदी सहज पूर्ण होत होत्या त्या आता होईनाशा झाल्या. त्यामुळे आहे त्या निसर्गावर काम भागवण्याचे दिवस संपले. म्हणजेच नवनिर्मितीचे दिवस आले. म्हणून ऋषभदेवांनी वृक्षांची लागवड कशी करावी, शेती कशी करावी, अन्न कसे बनवावे, व्यापार कसा करावा, वस्त्रे कशी बनवावीत इ. अनेक जीवनोपयोगी साधनांचा क्रियात्मक उपदेश दिला. म्हणजेच ऋषभदेवांच्या चरित्रातून आपल्याला असाच संदेश मिळतो की जर निसर्गाचे वैभव क्षीण होत असेल तर आपण ते प्रयत्नपूर्वक वाढविले पाहिजे.
‘ज्ञाताधर्मकथा' या अर्धमागधी आगमातील 'रोहिणी' अध्ययनात, रोहिणीसारख्या एका कर्तव्यदक्ष स्त्रीने, सासऱ्याने दिलेल्या पाच तांदळाच्या अक्षदा माहेरी पाठविल्या. पाचच तांदळांची शेती करण्यास सांगितली. पुन:पुन्ह पेरणी करविली. पाच वर्षांनी त्या पाच अक्षदांचे अनेक गाड्या भरून तांदूळ निर्माण झाले. त्याठिकाणी भातशेतीचे सुंदर वर्णनही आढळते. म्हणजेच या कथेत भ. महावीरांचा संदेश केवळ संरक्षणाचा नसून संवर्धनाचाही आहे. पुढे याच ग्रंथात प्रवासादरम्यान जाता-येता विश्रांती घेण्यासाठी 'नंदमणिकारा'ने एक रम्य वनखंड व पुष्करिणीही निर्मण केल्याचे उल्लेख आढळतात. 'उपासकदशा' आगमात 'आनंद' नावाचा वैश्य श्रावक रहात होता. त्याच्याकडे ४०,००० गायींचे गोकुळ व ५०० नांगरांनी होणारी शेती होती. खऱ्या अर्थाने तो शेती, पशुपालन व व्यापार करणारा वैश्य होता. भ. महावीर स्वत: अनेक उद्यानात उतरत असत. अशाप्रकारच्या सर्व उल्लेखांवरून निसर्ग समृद्ध करण्याचेच संकेत आढळतात. अर्थातच जसजसे निसर्गाचे वैभव कमी कमी होत जाईल तसतसे माणसाने त्याचे रक्षण व संवर्धन प्रयत्नपूर्वक व विचारपूर्वक केले पाहिजे असा बोध भ. ऋषभदेवांच्या चरित्रातून व महावीरवाणीतून आपल्याला मिळतो. पण प्रत्यक्ष जैनांचा आचार काही वेगळाच आहे.
जैनग्रंथात वनस्पतींचे वर्णन कितीही अचूक असले तरी महाभारतातील (शांतिपर्व ) वर्णनाप्रमाणे - 'वृक्ष हे आमचे मित्र आहेत, पुत्र आहेत. ते वातावरण शुद्ध ठेवतात. त्यांना आपण वाढविले पाहिजे', असे स्पष्ट आदेशात्मक संकेत जैनवाङ्मयात मिळत नाहीत. जैनांची एकंदर दृष्टीच अशी दिसते की वृक्षांच्या जवळ जाऊ नका, त्यांना तोडू नका, त्यांना हात लावू नका, त्यांचा वापर करू नका, असा जैनांचा वनस्पतींकडे पाहण्याचा दृष्टिकोण का अव याची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करू.
जैन परंपरा एक 'श्रमण परंपरा' 'म्हणून प्रसिद्ध आहे. संन्यास आणि निवृत्तीला प्राधान्य देणारा साधुधर्म त्यात मुख्यत्वे करून सांगितला आहे. आजूबाजूच्या सर्व निसर्ग, चैतन्यमय जीवांनी भरलेला असल्यामुळे त्यातील घटकांचा कमीत कमी वापर केला पाहिजे, हे अहिंसामय साधुधर्माचे मुख्य मंतव्य आहे. साधुधर्माच्या जोडीजडीनेच श्रावकधर्माचीही वाढ झाली. ती मुख्यत: साधुवर्गानेच केल्यामुळे साहजिकच साधुधर्मातील नकारात्मकता त्यात प्रतिबिंबित होत राहिली. श्रावकांनीसुद्धा त्याचेच ग्रहण करून, आपल्या अधिक विचारांनी वर्तणुकीचे नवनवीन नियम शोधले. नकारात्मकता, बचावाची दृष्टी व कमीत कमी वापर हे साधुआचाराशी सुसंगत असले तरी, श्रावकाच्या जीवनध्येयाशी ते तितकेसे सुसंगत ठरत नाही.
समजा एक चांगले वाढलेले शाकाहारी जेवण एखाद्या जैनेतरासमोर ठेवले तर तो नमस्कार करून म्हणेल, 'अन्न हे पूर्णब्रह्म'. आनंदाने त्या अन्नाचे भक्षणही करेल. याउलट जैन माणसासमोर ठेवले तर प्रत्येक पदार्थाविषयी शंका, संशय व चिकित्सा यांनी त्याच्या मनात काहूर माजेल. खावे की खाऊ नये या संभ्रमात तो पडेल. एकाच अन्नाकडे पाहण्याचे किती परस्परविरोधी दृष्टिकोण आहेत हे ! परिणामस्वरूप पिढ्यान्पिढ्या जैन समाजाला वनस्पती व प्राणिसृष्टीची साधी माहिती सुद्धा नाही. कोणतेही झाड, पान, फूल, फळ, पशु, पक्षी सहजी ते ओळखू शकत नाहीत. कारण झाडे लावणे, झाडांच्या जवळ जाणे, पक्षीनिरीक्षण करणे हे त्यांच्या गावीच नाही. परिणामी