________________
पैशांचा व्यवहार
पैसे येतील! तर हे (पुण्याचा) चेक घेऊन आले होते, तो तुम्ही आज वटवला! त्यात तुम्ही काय श्रम केले? पण तरीही लोक म्हणतात, 'मी इतके मिळवले, मी मेहनत केली!' अरे, एक चेक वटवला त्यास काय मेहनत केली म्हणायचे? आणि ते सुद्धा, जेवढ्याचा चेक असेल, तेवढेच मिळतील, त्याहून जास्त मिळणार नाही ना? आले का लक्षात?
माझे म्हणणे असे की गंभीर व्हा, शांत व्हा, कारण ज्या पुरणगलनसाठी लोक धावपळ करीत असतात, गुणाकार-भागाकार करीत राहतात, ते सर्व स्वतःचे जन्म बिघडवतात आणि बँकबॅलेन्स मध्ये तर काही बदल होऊ शकेल असे नाही, कारण ते नैसर्गिक आहे. जे निसर्गाच्या हातात आहे त्यात तुम्ही काय फरक करू शकणार? म्हणून आम्ही तुमची भीती काढून टाकतो. आम्ही 'जसे आहे तसे' उघड करीत आहोत, की बेरीज-वजाबाकी (कमावणे किंवा गमावणे) ही कुणाच्या हातची गोष्ट नाही, ती निसर्गाच्या हातात आहे. आणि बँकेत (खात्यात) किती जमा होणे हेही निसर्गाच्या हातात आहे. आणि बँकेत कमी होणे हे सुद्धा निर्सगाच्याच हातात आहे. नाहीतर बँकेवाल्याने एकच खाते ठेवले असते. फक्त क्रेडिट खाते, डेबिट खाते ठेवलेच नसते.
कोणाशीही कटकट करू नका. आणि अशी माणसे तर केव्हातरीच भेटतात ना? आता असल्या माणसांबरोबर भांडण पत्करून काय उपयोग? एकदा सांगून बघावे की, 'बाबा, देवाचे स्मरण तर ठेव' तेव्हा जर तो म्हणाला, 'देव-बीव मी काही जाणत नाही. असे शब्द निघाले की आपण समजून जायचे की हा भांडखोर आहे!
लाचारीसारखे दुसरे पाप नाही. लाचारी करू नये. नोकरी मिळत नसेल तर लाचारी, धंद्यात तोटा आला तरी लाचारी, इन्कमटॅक्स ऑफिसरने धमकावले तरी पण लाचारी. अरे! लाचारी का म्हणून करायची? जास्तीत जास्त पैसे घेऊन जाईल, घर घेऊन जाईल, आणखी काय घेऊन जाणार? मग लाचारी कशासाठी? लाचारी म्हणजे तर भगवंताचा भयंकर अपमान आहे. आपण लाचार झालो की आतल्या भगवंताचा भयंकर अपमान होतो. पण भगवंत तरी काय करणार?