________________
खडतर अशा सामाजिक, भौगोलिक, राजकीय परिस्थितीत साध्वींनी ज्या दृढश्रद्धेने आध्यात्मिक प्रगती साधली, त्यामुळे तर आगमकालीन स्त्रियांच्या उत्कृष्ट मनोबलाचे ऊर्जस्वल दर्शन घडून आले.
चतुर्विध संघाला दृढप्रतिष्ठ करण्यात ज्यांचा फार मोठा सहभाग आहे, अशा जैन श्राविकांचा अथवा उपासिकांचा विचार आपण यानंतर केला. श्वेतांबर जैन आगमांत 'श्रावकाचार' स्वतंत्रपणे उपलब्ध नाही. आगमात उल्लेखित अशा श्राविकांचा विचार केल्यावर, गृहस्थाश्रमातील धार्मिक जीवनाचे एक प्रगल्भ चित्र आपल्यासमोर उभे राहते. पतीच्या सांगण्यानुसार श्राविका बनलेल्या, स्वतंत्रपणे धर्मोपदेश ऐकून श्रद्धावान बनलेल्या, स्वत: बरोबर कुटुंबियांनाही निष्ठ बनवणाऱ्या, पतीला श्रावकव्रतात स्थिर करणाऱ्या, स्वधर्मीय व इतर धर्मीयांशी मोकळी, तर्कसंगत चर्चा करणाऱ्या, साधर्मिकांचे स्वागत करणाऱ्या, साधुप्रायोग्य आहार-वसतिदान करणाऱ्या, तत्त्वांपासून विचलित न होणाऱ्या, अंतिमः संलेखनेने देहत्याग करणाऱ्या, मोक्षमार्गी झालेल्या, अशा स्त्रियांच्या धार्मिक जीवनाचा प्रत्यय आपणास आगमातून येतो. अपवादादाखल पतीला धार्मिकतेपासून परावृत्त करणाऱ्या, मद्यपी, क्रूर अशा रेवतीसारखे एखादे उदाहरणही क्वचित आढळते. साध्वी व उपासिका या दोन्ही रूपात आगमकालीन जैनधर्मी स्त्रीचे आदरणीय स्थान आपल्याला दिसून येते.
जैन धर्मग्रंथांतील स्त्रियांचे सांस्कृतिक जीवन :
भरभराटीस आलेली समृद्ध नगरे, त्यातील आखीव मार्गरचना, मालाने ओथंबून वाहणाऱ्या बाजारपेठा, अनेक मजली भव्य राजप्रासाद, धनिकांच्या हवेच्या रूपसंपन्न गणिकांचे वैभव, नंदा - पुष्करिणीसारखी आरामोद्याने, राण्यांची शयनगृहे, ग्रामांमधील हिरवीगार शेते, पशुशाळा, धान्य, वस्त्रे, उपभोगाच्या सामग्रीची रेलचेल, विविध क्रीडा, लयनाट्य इत्यादि मनोरंजनाची साधने, ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात साजरे केलेले मनमोकळे सामाजिक उत्सव, अश तऱ्हेच्या अनेक उच्च अभिरूचींनी नटलेल्या सांस्कृतिक जीवनाचा ठसा, आगमांच्या अभ्यासकाच्या अंत:करणावर, प्रथमदर्शनी उमटतो. सुखसाधनांची कोणतीही उणीव नसलेल्या राजपुत्र व राजकन्यांच्या दीक्षा, अनेक कारणांनी समाजातील विविध स्त्रियांनी अंगीकारलेला श्रावकधर्म व साध्वीधर्म, विविध धर्मोपदेशसभा, अंतकृद्दशेत स्त्रियांनी आचरलेली कठोर तपे, प्रौषधशाळा, जैन व जैनेतर पारिव्राजिकांचे संवाद - वादविवाद, श्रद्धाळू श्राविकांनी साधुसाध्वींना दिलेले आहारदान, असे एक धर्मप्रवण जीवनाचे चित्रही त्याचवेळी डोळ्यासमोर उभारते. विविध रोग, दुष्काळ, , रोगाच्या साथी, युद्धे, राजकीय कारस्थाने, अंतःपुरातील कलह, छोटे-छोटे व्यवसाय करणारी गीब दांपत्ये, बलात्कार, अपहरण, अनैतिक संबंध असे अनेक गुन्हे व सामाजिक अपप्रवृत्ती, भूत-प्रेत-विभूती, मंत्र-तंत्र, नवससायास, यक्षावेश याच्या मागे लागलेल्या अंधश्रद्धाळू व्यक्ती व विशेषतः स्त्रिया, राजगृहात, धनिकांकडे व सामान्यजनांच्या घरात अन्न-वस्त्रापायी आयुष्याच्या आयुष्य खाली मान घालून काम करीत राहणाऱ्या दासी, धात्री, दासचेटी, कर्मकरी, दासीपुत्र व त्यांचे कलह, थट्टामस्करी असे निम्न स्तरातील व्यक्तींचे संपूर्ण वेगळेच विश्व आ दिसून येते. या तीन प्रकारच्या धाग्यांना बेमालूम सरमिसळ करून करून एकत्र विणून तयार होते ते आगमकालीन संस्कृतीचे वस्त्र !
जैन धर्मग्रंथांतील स्त्रियांचा संदेश :
आर्या चंदना, तीर्थंकर मल्ली, साध्वी राजमती, श्राविका जयंती, आदर्श गृहिणी रोहिणी या स्त्रिया, सर्व स्त्रीजातीला व आधुनिक स्त्रीमुक्ती चळवळीच्या धुरीणींना असा उर्जस्वल संदेश देत आहेत की - 'उच्च दर्जा व स्थान मिळविण्यासाठ आपण स्वत: झगडले पाहिजे. आपली सर्व सामर्थ्ये पणाला लावून व ज्ञानाची कास धरून कर्तृत्व केले पाहिजे. द्वेष, असूया करून अगर हक्कांची भीक मागून कोणतेच स्थान मिळत नाही. कर्तृत्वसंपन्न स्त्रीकडे श्रेष्ठ स्थान आपोआप चालत येते. भारतीय संस्कृतीत हे स्थान मिळवायचे असेल तर कर्तृत्वसंपन्नतेला शुद्ध आचरण व आत्मोन्नतीच्या तळमळीची जोड असणेही आवश्यक आहे. अन्यथा हजारो वर्षे लोटल्यावरही आगमकालातील तेजस्विनींचे हे स्थान